Friday, August 9, 2013

चांगल्या परताव्याची संधी साधणे चांगलेच

मेहनतीच्या रकमेतून आपण कमविलेल्या मालमत्तेमधून आपल्याला चांगला परतावा मिळावा, तोही आपल्या वेळेला मिळावा अशी सर्वसाधारण अपेक्षा प्रत्येकाची असते, अशी अपेक्षा साहजिकच आहे. मात्र, कधी-कधी काळाच्या रूपाने आलेली नव्या व फायदेशीर गुंतवणुकीची संधी ओळखता यायला हवी. यातूनच तयार होत असते ते नव्या गुंतवणुकीचे व व्यवहाराचे गणित. हा व्यवहार ठरवितो जुनी मालमत्ता कधी विक्री करायची ते आणि त्यासाठीचे गणित...

नेहमी आपण सकारात्मक विचार करावा, असे वडीलधारी मंडळी व संत सज्जन सांगत आलेले आहेत. मालमत्तेबाबतीत विचार मांडताना गुंतवणुकीत, मालमत्तेमध्ये सतत भर घालण्याचा हेतू असावा असा विचार आपण मांडतो. मात्र गुंतवणूक केलली मालमत्ता विकून, त्यातून चांगला परतावा मिळवून भविष्यात त्यातूनही अधिक चांगला परतावा मिळविण्यासाठी पुन्हा गुंतवणूक केली तर... हा आणखी सकारात्मक विचार व प्रगतीच्या दिशेने पाऊल नव्हे काय? मात्र आपली मालमत्ता नेमकी कधी विक्री करावी याचा नेमका अंदाज घेणे कधीही फायद्याचेच ठरते.

गुंतवणुकीचे नियोजन व परताव्याची अपेक्षा साधारणपणे ज्या वेळी आपणाला नव्या गुंतवणुकीसाठी काही निधीची कमतरता जाणवत असते, त्या वेळी प्रत्येक जण जुनी मालमत्ता विकतो. नव्या गुंतवणुकीसाठी कर्ज घेण्यापेक्षा जुनी गुंतवणूक निकाली काढून, आलेली रक्कम व हाताशी असलेली रक्कम मिळून नव्या गुंतवणुकीचे नियोजन आपण करतो. नवी गुंतवणूक करताना जुन्या गुंतवणुकीतून आलेल्या परताव्यातून इमर्जन्सी म्हणून देखील आपण काही रक्कम हाताशी बाळगतो.

काही वेळा मालमत्तेसाठी आपण कर्ज घेतलेले असते. ती मालमत्ता विकून नवी मालमत्ता घेण्याआधी या जुन्या मालमत्तेवरील कर्ज फेडून आपण आपले हात मोकळे करणार असतो... या सर्व संबंधाने तुमच्या व्यवहाराच्या गणितातील बारकावे आधी जाणून घ्या आणि मगच व्यवहाराला सामोरे जा..

गरज आणि वेळ : मालमत्ता विक्री करताना प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी असते. कोणी निधीची आवश्‍यकता म्हणून तर कुणी नवी संधी साधण्यासाठी ही गुंतवणूक केलेली मालमत्ता विक्री करतो. मात्र ही संधी साधण्यासाठी नियोजन केले तर होणारे नुकसान कमी आणि फायदा अधिकच होताना दिसेल.

प्रत्येकाची गरज आणि वेळ ही वेगळी असते. ही गोष्ट साहजिक आहे. मात्र केवळ गुंतवणूक या अंगाने भविष्यासाठीचे नियोजन केले, तर ही मालमत्ता विक्रीची वेळ तुम्हाला ठरविता येईल. जसे की, कोणत्या वर्षी ही मालमत्ता विक्री करून नवीन मालमत्तेत आलेला निधी गुंतविणार आहोत... पण हा निर्णय घेताना या नियोजनासोबत त्या वेळची बाजारपेठेची स्थिती देखील तेवढीच महत्त्वाची ठरते. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.

बाजारपेठेची स्थिती आपल्या विक्रीच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावित असली तरी त्या मालमत्तेमधून तुम्हाला किती परतावा हवा आहे, याचे अधिकतम रकमेचे गणित तुम्ही अनुभवच्या जोरावर ठरवू शकता.

परताव्याचे समाधान परताव्याच्या समाधानाबाबत प्रत्येकाची समाधानाची पातळी वेगवेगळी असू शकते. या मालमत्तेसंबंधाने त्या मालकाची अपेक्षा व गरज जेवढी तेवढीच त्याच्या समाधानाची पातळी कमी- अधिक असेल असा प्राथमिक अंदाज बांधावयास काहीच हरकत नाही. त्यात भर पडते ती लोकेशन, जागामालक व खरेदीदाराची गरज (जशी जागामालकाची गरज असते तशीच काही वेळा खरेदीदारीचीही निकड असलेली जाणवते.) ऑफर केलेली रक्कम या व व्यवहाराच्या इतर कसोट्या मालमत्ता विक्रीच्या वेळी तपासून घेऊ शकता. कधी- कधी समाधानाची पातळी कमी असली तरीही मालमत्ता विक्री करावी लागते. कारण आपल्यासमोर निर्णय घेण्यासाठीचा वेळ कमी असतो व ती वेळ अगदी अटीतटीची असते. अशी वेळ नसेल तर सहसा कोणी मालमत्ता विक्री करण्याचा निर्णय घेत नाही. मात्र आपली वेळ ओळखून निर्णय घेतलेला कधीही उत्तम.

मागणी आणि पुरवठा
बाजारपेठेत जागा, जमीन प्लॉट आणि घर वा फ्लॅटच्या संबंधाने वेगवेगळी स्थिती असलेली आपल्याला जाणवते. त्याच्या गणितात विविध गोष्टींचा अंतर्भाव असलेला जाणवेल. प्लॉटसंबंधाने विक्री वा खरेदी करतानासाठीच्या कायदेशीर प्रक्रिया तुलनेने थोड्याशा अधिक आहेत. त्यासाठी अधिकचा वेळ देऊन त्यांची तपासणी केलेली बरी. ज्यात सातबारा, एनए, कररचना व करांचा भरणा या व आदी गोष्टींचा समावेश त्यात असू शकतो. घर, फ्लॅटसंबंधाने ही प्रक्रिया थोडीशी सोपी आहे. कारण इथे आवश्‍यक कायदेशीर कागदपत्रांची आवश्‍यकता ही तुलनेने कमी असते, तसेच सुरक्षितताही अधिक असते. घरांच्या कागदपत्रांची तपासणी आपण आपल्या पातळीवर जसे करतो तसेच बॅंकांच्या पातळीवर घरासाठी कर्ज दिले जाताना तपासणी केली जाते, त्यामुळे या प्रक्रियेत आपणाला कमी-अधिकच्या गोष्टी कळू शकतात. जशी ही गोष्ट खरेदीच्या वेळी लागू पडते, तशीच गोष्ट विक्री करतानाही आवश्‍यक ठरते. कर्जासंबंधाने व बॅंकेची सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच ताबा देणे अपेक्षित आहे म्हणून ही कायदेशीर प्रक्रियेची गोष्ट दोन्ही पातळ्यांवर गरजेची आहे. कधी फ्लॅट तर कधी प्लॉट विक्री तेजीत असते. ही परिस्थिती मागणी आणि पुरवठ्यावर अबलंबून असणार आहे. मात्र नव्याने आलेल्या व येऊ घातलेल्या कायद्यांमुळे घर आणि प्लॉट, जमिनीची खरेदी -विक्री दोन्ही गुंतागुंतीची होताना दिसणार आहे अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

संधी ओळखणे गरजेचे

ही संधी ओळखता येण्यासाठी वेगळा दृष्टिकोन हवा. हा दृष्टिकोन अभ्यासातून विकसित होईल. आत्ता आपल्याकडे असलेली मालमत्ता विकून एखादी मालमत्ता आपण खरेदी केल्यानंतर आपणास भविष्यात मोठा नफा मिळविता येणार आहे, याची खात्री असेल तर तुम्ही आता असलेली मालमत्ता विकून, जुनी मालमत्ता विकून आलेली रक्कम व आपल्याकडील रक्कम अशी दोन्ही मिसळून नवी गुंतवणूक करायला हरकत नाही.

गुंतवणुकीपूर्वी खालील गोष्टी तपासून घ्या !
- मालमत्ता विकताना बॅंकेकडून घेतलेले कर्ज किती शिल्लक आहे?
- त्याचा ईएमआय किती भरतो आहोत?
- किती रक्कम भरून आपणास या जुन्या मालमत्तेसाठीच्या कर्जातून क्तता मिळावायची आहे?
- नवी मालमत्ता खरेदीसाठी किती रक्कम लागणार आहे?
- हप्त्याची, कर्जाची रक्कम तसेच आपण अपेक्षित धरलेला परतावा ही सर्व रक्कम आपण विक्री करीत असलेल्या मालमत्तेमधून मिळणार आहे का याची खात्री करून मगच ती विक्री करावी.
- हा व्यवहार करताना समोरच्याची निकड जाणा आणि व्यवहाराची रक्कम ठरवा. मात्र ही व्यवहाराची चर्चा एका विशिष्ट पातळी पर्यंतच ताणली जावी. अन्यथा, तो व्यवहार फिसकटण्याची शक्‍यताच अधिक असते. अधिकच्या परताव्याच्या अपेक्षेने असे कधी-कधी नव्हे तर बहुतांश वेळा असे घडते. 

No comments:

Post a Comment