Saturday, March 22, 2014

विकसनशील शहरं आणि गुंतवणूक

शहरीकरण ही एक अपरिहार्य व गरजेची घडामोड बनली आहे, हे सर्वमान्य आहे. ही घडामोड, प्रक्रिया कोणाच्याही नियंत्रणात नाही वा त्यासंबंधाने काही नियोजनही नाही, ही बाब देखील तेवढीच सत्य आहे. आज सुमारे ९२ कोटी लोकसंख्या शहरात राहते. देशात २०२० पर्यंत एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७५ टक्के लोकसंख्या ही शहरात असणार आहे... 

शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा, व्यवसाय अशा विविध कारणांनी लोक खेड्यातून शहरी भागाकडे स्थलांतरित होताना दिसतात. ही शहरीकरणाची प्रक्रिया काय आहे ? ती का होतेय ? त्याचं निराकरण करणारी उत्तरे आपल्याकडे आहेत का? याचं उत्तरं शोधायचं म्हटलं तर आज त्यावर काही पर्याय वा ती शोधण्याची मानसिकता दिसत नाही. दुर्दैवाने सध्या तरी असंच चित्र पाहायला मिळतं. यासंबंधाने आपण हतबल आहोत, असंच म्हणावे लागेल. ही बाब सद्यस्थितीला तरी लागू पडते, असे वाटते.

शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा, व्यवसाय ग्रामीण या सेवांचा ग्रामीण भागात वाणवा असल्यानं मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थलांतरित होताना दिसते. परिणामी शहरात सर्वांचीच निवासाची व्यवस्था पुरी होतेच असे नाही. एकदा का शहरात स्थलांतर झाले की, ती व्यक्ती एकेक करून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शहराकडे आणते. परिणामी अधिकच्या जागेची गरज भासते. हा निवासाच्या गरजेचा प्रवास असाच पुढे सुरू राहतो अन् वाढतही जातो... आणि या सर्व गोष्टींचा परिणामस्वरूप शहरांचा विस्तार ही एक सहज प्रक्रिया बनून जाते.

राज्यातली स्थिती...
शहरांचा विस्तार आणि विकास आणि त्याभोवतालच्या शहरांसह त्यांचा विकास, विस्तार व त्यातील गुंतवणूकीची संधी लक्षात घेतली तर अशी अनेक विकसनशील शहर आज आपल्याला दिसतील. विकासाच्या भाषेत ओळखीने सांगावयाचे झाल्यास टायर वन आणि टायर टू सिटीज... अशी अनेक शहर आज उदयाला येत आहेत. यातील राज्यातील काही निवडक शहरांचा व त्या भोवताली विकसित होत असलेल्या शहरांचा आढावा आपण घेऊ...

वसतेय नवीन मुंबई... 
 मुंबईची स्थिती सर्वज्ञात आहे. मुख्य मुंबई शहर आणि नजीकच्या उपनगरात ना जागा- ना जमीन शिल्लक आहे, तिथं घर घेण्याची सामान्य माणसाची ताकदही नाही. त्यामुळे सामान्य मुंबईकर, चाकरमानी किंवा जी व्यक्ती रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्याला येते आहे, त्यांना निवारा शोधण्यासाठी मुंबईपासून सुमारे एक तास ते तीन तासांचा प्रवास करून यावे व जावे लागते.

एकेकाळी विरार वा कल्याणहून कामासाठी मुंबईत येणाऱ्या मंडळीची कहाणी ऐकली की आपणाला आश्चर्य व्हायचे, आणि त्यांच्या सहनशीलचे कौतुक आपण करायचो मात्र आज त्याही पुढे वेस्टर्न लाईनवर पालघऱ, भोईसरपर्यंत ही वाढ होताना दिसते आहे. एमआयडीसी आणि इतर औद्योगिक केंद्रांनी आणि त्यातील मनुष्यबळाच्या गरजेने याभागातील वसाहत वाढविली आहे. त्यामुळे इथे विकास गतीने होताना दिसतो आहे.
सेंट्रेल लाईनचा विचार करता नाशिकच्या दिशेने शहापूर, आडगाव, टिटवाळा आदी गावांचा विकास होताना दिसतो आहे. ती मुंबईची उपगनरं बनण्याच्या वाटेवर आहेत. इथे मोठ्या प्रमाणात घरांसाठी मागणी होताना दिसते आहे. इतके दिवस भरपूर मागणीत असलेले बदलापूर, अंबरनाथ, उल्हानगर हे भाग आता मुंबईची उपनगर होण्याच्या मार्गावरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. इथे जागा आण जमिनीची उपलब्धता कमी झाल्याने लोक इथूनही पुढच्या टप्प्यांचा विचार करू लागलेले आहेत.

पुण्याच्या दिशेने विचार करायचा झाल्यास पनवेल, कळंबोली याभागात आता जमिनीची कमी अधिक प्रमाणात उपलब्ध असली तरी आता नवी मुंबईच्या नंतरची आणखी एक नवी मुंबईच्या स्थापनेच्या मार्गावर आहे, ती म्हणजे पनवेलपासून सुमारे दहा ते पंधरा किमीमीटर अंतरावर असलेले सिडकोचा `नैना` प्रकल्प (नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नोटिफाईड एरिया) सुरू होतो आहे. सुमारे साठ हजार हेक्टरवर हा प्रकल्प, शहरं उभा राहणार आहे. त्यातल्या पहिल्या टप्प्यात सुमारे आठ हजार हेक्टरमध्ये सुमारे आठ शहरं उभा करण्याचे नियोजन आहे. हे संपूर्ण शहर उभं झाल्यानंतर ८० लाख लोकसंख्या सामावून घेण्याएवढी या नव्या शहराची क्षमता असणार आहे. मुंबईचा हा विस्तार किती किलोमीटर पर्यंत झाला असा आढावा घ्यायचा झाल्यास तो साठी ते सत्तर किलोमीटपर्यंचा विस्तार झालेला आपणास दिसतो.

कोकण 
सागरसंपत्ती, मसाले, आणि देवभूमी म्हणून ओळखळी जाणाऱ्या कोकणला सागरी किनारा आणि डोंगररागांनी विकासावर जशा मर्यादा आणलेल्या दिसतात. पण जागा, जमिनीतील गुंतवणूकीसाठी `खाण` म्हणून कोकणाची ओळख बनू पाहते आहे. त्यात रत्नागिरी, मुंबईशी जवळीकता असल्याने अलिबाग, मालवण, वेंगुर्ले, चिपळून या डेस्टिनेन्शनचा उल्लेख करता येईल. याशिवाय पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेची व तीर्थक्षेत्र असलेल्या पावसमधील गुंतवणूक देखील प्राधान्यक्रमावर आहेच.

पुणे – बृहद् विस्ताराच्या प्रतीक्षेत...
पुणे शहराच्या विकासाचा, वाढीचा विचार केला तर अनेक सर्वक्षणांमधून सिद्ध झाल्याप्रमाणे खराडी, पिरंगुट, हिंजवडी, ताथवडे, रावेत, मोशी आणि वाकड ही पुणे शहरातील हॉट डेस्टिनेशन ठरत आहेत. त्याही पुढे जाऊन हिंजवडी, ताथवडेसह पुणे, मुंबई एक्स्प्रेस वे कॉरिडॉरमधील उपनगरांत आगामी वर्षांमध्ये जोमाने विकास होणार असल्याने दिसते आहे. त्यामुळेच या भागांना अधिक प्राधान्यक्रम मिळेल, प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त होतोय. नगर व सोलापूर रस्त्यांना नव्याने विस्ताराला सुरवात होत असून पुणे शहराच्या विकासात ही दोन्ही रस्त्यांवरील उपनगरं, गावं डेस्टिनेशन मोलाची भूमिका बजावणार आहेत.

याशिवाय पुणे शहर आणि परिसराच्या विकासासंबंधाने सर्वांच्याच अपेक्षा लागून असेलला विषय म्हणजे `पीएमआरडीए`ची स्थापना. पुणे महानगर विकास प्राधीकरणाच्या स्थापनेनंतर व नव्या प्रस्तावित रिंगरोडमुळे शहारानजीक असलेल्या विकसनशील शहर विकासाचा प्रचंड वेग घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे हा विस्तार दौंड, लोणावळापर्यंत होताना दिसणार आहे. त्यातही बांधकाम क्षेत्रापुरते सांगावयाचे झाल्यास `पीएमआरडीए`ची घोषणा होण्याआधीच पंचक्रोशीतील विकासास सुरवात झाली आहे. काही दौंड, लोणावळा, भोर, शिरूर, अशा शहरांनी या क्षेत्रात लक्षणीय अशी उलाढाल होताना दिसते आहे.
‘रिंगरोड‘चा विचार केला तर चार टप्प्यात हा विकास पूर्ण होणार आहेत. ज्यामुळे पहिला टप्पात थेऊरफाटा ते केसनंद, वाघोली-भावडी, तुळापूर-आळंदी, केळगाव-चिंबळीफाटा या गावांचा, दुसऱ्या टप्प्यात चिंबळीफाटा ते निघोजे, सांगुर्डे-शेलारवाडी, शिरगांव-चांदखेड, रिहे-घोटावडे-पिरंगुट या गावांचा, तिसऱ्या टप्प्यात पिरंगुट-उरवडे, मुठा बहुली-सांगरुण, खामगाव-घेरा सिंहगड कल्याण, कोंढणपूर-खेडशिवापूरता तर चौथ्या टप्प्यात श्रीरामनगर- वेळू, गोगलवाडी-पठारवाडी, भिवरी-वडकीनाला-थेऊर फाटा या गावांतील रिंगरोड होईल विकासाला सुरवात होणार आहे.

औरंगाबाद – कॉरीडॉरनं बदलला विकासाचा नकाशा...
ऐतिहासिक, ऑटोमोबाईल, बी-बियाणे, स्टील अशा विविध उद्योगांच्या बळावर प्रगतीची चाकं गतिमान करू पाहणाऱे औरंगाबाद आघाडीवर होते. मात्र मागील काही वर्षांमध्ये ही प्रक्रिया थांबून राहिलेली दिसत होती. मात्र आता तिला दिल्ली-मुंबई इंस्ट्रिअल कॅरिडॉर (डीएमआयसी) नवीन उर्जा मिळाल्याने हे शहर पुन्हा चर्चेत आणि गुंतवणूकीच्या नकाशावर व प्राधान्यक्रमावर येऊ लागलेले आहे.

या प्रकल्पाने पुन्हा एकदा औरंगाबाद शहर आणि परिसराला चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत. असे म्हटल्यास अधिकचे होणार नाही. २००८ मधील जागतिक आर्थिक उलाढालींने ओढावलेल्या परिस्थितीमुळे व जागतिक व देशी अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून इथला विकास थोडासा मंदावला होता. मात्र या प्रकल्पामुळे ही सारी कसर भरून निघणार आहे, `डीएमआयसी` प्रकल्पाअंतर्गत शेंद्रा ते बिडकीन या मुख्य दोन गावं मिळून बनीतांडा, निलज गाव अशा वाड्या, वस्त्यांसह सुमारे ८४ चौरस किलोमीटरच्या पट्ट्याचा औद्योगिक विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. साहिजकच या औद्योगिक विकासामुळे आगामी दहा वर्षात विकासाचा केंद्रबिंदू या शहरांवरच केंद्रीत होताना दिसेल.

नाशिक – `स्टेडी प्रोसेस...`
अकराव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या देशातील बारा शहरांमध्ये महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश होता. मात्र मागील काही वर्षांपासून दिल्ली-मुंबई इंस्ट्रिअल कॅरिडॉर (डीएमआयसी)च्या विकास प्रक्रियेच्या नकाशावर अंधुक होत गेलेल्या नाशिक शहर व परिसरात विकासासाठी मोठा वाव आहे. मात्र त्यानंतर नाशिक- पुणे- औरंगाबाद या सुवर्णत्रिकोणामुळे नाशिकचा विस्ताराला आगामी वर्षांत गती मिळणार यात शंका नाही. या सुवर्णत्रिकोणातील रस्त्यांचं जाळं पूर्णत्वास येत असून त्यामुळे नाशिक- मुंबई दोन तासांवर तर नाशिक- पुणे तीन- साडेतीन तासांच्या अंतरावर येणार आहे
आगामी काही वर्षांमधील नाशिक परिसरातील विकसनशील शहरांचा, गावांचा विचार केला तर या यादीत सिन्नरने सर्वात वरचा क्रमांक मिळविलेला दिसतो. त्या पाठोपाठ घोडी, ओझर, आडगाव, पिंपळगाव, पाथर्डी, इगतपुरी या शहरांसह नाशिक – धुळे रस्त्यांवरील गावांचा उल्लेख करता येईल. तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून देखील शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरचा विकास देखील त्या शहरांच्या गतीने होतोच आहे...

कोल्हापूर – विकासाला ताकद उद्योगांची
तीर्थक्षेत्र व उद्योगांच्या माध्यामातून विकासाची चव सुरवातीलपासून चाखणाऱ्या कोल्हापूर आणि परिसरात कोल्हापूर – जयसिंगपूर – इचलकरंजी या त्रिकोणातील औद्योगिक कॉरीडॉरमुळे या तिनही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं होताना दिसत आहे. याशिवाय सीमेवर असलेल्या उद्योगकेंद्र कागलने ला सुद्धा स्वतःच्या क्षमतांवर विकास घडवून आणलेला दिसतो. सीमाभाग म्हणून हे ठिकाण उद्योगाचं आवडतं केंद्र आहे. त्यामुळे इथं सर्वांगिक विकासाला चालना मिळताना दिसते आहे. याशिवाय कोल्हापूरनजीकचं निसर्गानं भरभरून वरदान दिलेला गगनबावडा हे सेकंड होमसाठी मागणी असलेल्या केंद्र म्हणून समोर येतं आहे.

नागपूर – विकसनशील व्यापार केंद्र
उपराजधानीचे शहर व मिहान प्रकल्पांमुळे विदर्भात नागपूरची घोडदौड कायम आहेच. मात्र त्यातही मिहान प्रकल्पाभोवती असलेल्या चंद्रपूर व वर्धा रस्त्यांवरील गावांमधील मुख्यत्वे बुटीबोरी, हिंगणा, सोनेगाव परिसर या शहरांमध्ये प्रगतीची चक्रं आगामी वर्षांमध्ये गतीने फिरलेली दिसतील.

मिहानपाठोपाठ इथं आता आयटी कंपन्या येऊ घातल्यात. तशी मोठ्या केंद्राची घोषणा इन्फोसिसने यापूर्वीच केलेली आहे. त्याशिवाय विमान कंपन्या, बीपीओ, एलपीओंमुळे रोजगाराच्या संधी या परिसरात वाढत जाताना दिसतो आहे. केवळ मिहान प्रकल्पाचाच परिसर नाही तर रिंगरोडमुळे भंडारा बायपासवरील विहीरगाव, बाजारगाव आदी शहरं देखील विकस प्रक्रियेत सहभागी होऊन नवीन विकसित उपगनरं म्हणून समोर आलेली आहेत.

सुमारे दीडशे किलोमीटरच्या परिसरात मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि आंध्रप्रदेश या राज्यांचा सीमाभाग आणि मिहान प्रकल्पांमुळे विकसित होत असलेले व्यापार केंद्र म्हणून नागपूर आणि पसिसराची ओळख विकसित होताना दिसेल.